सदोष मतदार याद्या वापरणे म्हणजे भ्रष्ट प्रयोगाची पुनरावृत्तीच   

वकील असीम सरोदे यांची टीका 

पुणे : विधानसभा निवडणुकीत बोगस मतदारांच्या भरवशांवर निवडणूक जिंकली. या मतदारयाद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वापरणे म्हणजे भ्रष्ट प्रयोगाची पुनरावृत्ती होणार आहे, अशी टीका वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केली. 
 
यावेळी वकील श्रीया आवाले, वकील बाळकृष्ण निढाळकर, वकील अरहंत धोत्रे आणि वकील रोहित टिळेकर उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत उपयोगात आणलेली मतदार यादी राज्य निवडणूक आयुक्तांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मागवली आहे. म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी तयार केलेल्या शंकास्पद मतदार याद्यांचा वापर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जो आश्चर्यकारक निकाल लागला आहे, त्यामागे मतदार याद्यांचा मोठा भ्रष्ट्राचार आहे. याचे अनेक पुरावे उच्च न्यायालयात मांडले आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांपैकी जवळपास १०० मतदार संघाचा निकाल संशयास्पद आहेत. त्याविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. 
 
मतदार याद्या अद्ययावत आणि नि:शंक स्वरूपात तयार करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण मतदारांची संख्या ९.७३ कोटी होती. त्यानंतर ती मतदार नोंदणी झाली. त्यानुसार ९.८० कोटी इतकी ही संख्या झाली. जर जुनीच मतदार यादी वापरली तर तब्बल ७ लाख नवमतदारांना मतदानापासून वंचित राहवे लागेल. हा मतदारांवर मोठा अन्याय आहे, असे वकील श्रीया आवले यांनी सांगितले.
 

Related Articles